"१० जूनपर्यंत सर्व प्रलंबित कामांचा निपटारा करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश"

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ९ जून :– शेतकऱ्यांना फार्मर्स आयडी मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या ॲग्रीस्टॅक नोंदणीसह जिल्ह्यातील सर्व प्रलंबित कामे १० जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी जलसमृद्ध गाव, स्मशानभूमी समस्या निवारण, वृक्ष लागवड अभियान, नागरिकांच्या तक्रारी यावर सखोल चर्चा करत प्रलंबित कामांचा त्वरित निपटारा करण्याचे आदेश दिले. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आपल्या स्तरावर प्रलंबित प्रकरणांची खातरजमा करून प्रत्यक्ष अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले.
जलसमृद्ध गाव अभियानांतर्गत विहीर व बोअरवेल पुनर्भरण, छतावरील जलसंचय यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी आणि नोंदणीची माहिती सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
जुनी प्रकरणे, नागरिकांच्या तक्रारी, लोकप्रतिनिधींच्या मागण्या यांचा प्राधान्याने निपटारा करून जिल्ह्यात शून्य प्रलंबितता साध्य करावी, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.