“निवडणुकीआधी निधी, नंतर विस्मरण – युती सरकारवर आपचा हल्लाबोल”

“निवडणुकीआधी निधी, नंतर विस्मरण – युती सरकारवर आपचा हल्लाबोल”

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे (प्रतिनिधी)दि १५ जून :- मावळ तालुक्यातील कुंडमळा पुलाच्या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या घटनेप्रकरणी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी थेट राज्यातील युती सरकारवर निशाणा साधला आहे.

"ही घटना अत्यंत वेदनादायक असून सामान्य माणसाला हतबल करणारी आहे. पण याला जबाबदार कोण?" असा सवाल किर्दत यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी आठवण करून दिले की, "निवडणुकीपूर्वी भाजप व राज्य सरकारने या पुलासाठी आठ कोटींचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले होते. त्याचे स्वागतही करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात निधी खर्च झाला नाही. निवडणुकीत मात्र बोगस लाभार्थ्यांसाठी भरपूर निधी होता, पण जनतेच्या सुरक्षेसाठी नव्हता."

त्यांनी यंत्रणांवर टीका करताना म्हटले की, "पुलांचे ऑडिट करून जुजबी उपाय केले जातील, पण तो पर्यायी उपाय ठरतो. खरे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेला प्राथमिकता देण्याचे भानच शासनाकडे नाही हेच यातून स्पष्ट होते."

किर्दत यांच्या मते, हा अपघात केवळ नैसर्गिक किंवा अनपेक्षित नसून, "राजकीय दुर्लक्ष आणि प्राधान्यक्रमातील गोंधळ" याचे फलित आहे.