“पोकळ आश्वासनांना शेतकऱ्यांचा इशारा; हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन!”

“पोकळ आश्वासनांना शेतकऱ्यांचा इशारा; हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन!”
“पोकळ आश्वासनांना शेतकऱ्यांचा इशारा; हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन!”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातील शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

अस्मानी संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता सुलतानी प्रशासनाचा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. पीकविमा मिळण्यात होणारा विलंब, कर्जमाफीची रखडलेली प्रक्रिया, अतिवृष्टीग्रस्तांना मदत न मिळणे तसेच ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याच्या समस्यांमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

“शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांची खैरात नको, तर तातडीने ठोस निर्णय हवेत,” अशी जोरदार मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. शासन आणि प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. “शेतकऱ्यांच्या हक्काचा छदाम न् छदाम मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👉 “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता निर्णायक लढा सुरू झाला असून प्रशासन काय भूमिका घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.”