“मरता येत नाही म्हणून जगतोय...” – बच्चू कडूंच्या भेटीतून समोर आलेल्या एका शेतकरी भगिनीचे विदारक वास्तव!
"व्याजाने घेतल्याशिवाय पेरता येत नाही... ही अवस्था संपणार कधी?"
महाराष्ट्र वाणी
धानोरा (ता. दिग्रस), १२ जुलै
"मरता येत नाही म्हणून जगावं लागतं..." – हे शब्द होते एका शेतकरी महिलेचे, जिची भेट माजी आमदार बच्चू कडू यांना आज धानोरा येथे झाली. उन्हाच्या झळा, कामाने मळलेले हात आणि डोळ्यांतून न दिसणारा पण जाणवणारा थकवा... तरीही तिच्या बोलण्यातून आशेचा क्षीण आवाज उमटत होता.
बच्चू कडू हे गावभेटीच्या दौऱ्यावर असताना त्यांना शेतात काम करत असलेल्या एका ताई भेटल्या. त्यांच्या आयुष्यातील कटू सत्य उलगडताना त्या म्हणाल्या –
"दरवर्षी सावकाराकडून पैसा उचलतो. पीक घेतो. मग काही फायदा न होता तो परत फेडतो. पुन्हा नवीन कर्ज. असंच चाललंय. सुटका कधी होणार, माहीत नाही..."
हे ऐकून स्वतः बच्चू कडूही काही क्षण स्तब्ध झाले. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर या अनुभवाचा भावनिक उल्लेख करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं केलं.
"व्याजाने घेतल्याशिवाय पेरता येत नाही... ही अवस्था संपणार कधी?" असा सवाल करत त्यांनी राज्य शासनाला खडबडून जागं करणारा संदेश दिला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ही दैन्यावस्था आजवर फक्त आकड्यांमध्ये मोजली गेली. पण या भगिनीचे शब्द म्हणजे संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशावरची ओरखड आहे.
शब्द ऐकले तरी काळीज हलतंय... सरकारने ऐकायचं कधी?