"वादा तोडल्याप्रकरणी महायुती सरकारवर गुन्हा दाखल करा!" – निजलगावच्या बैठकीत शेतकऱ्यांची जोरदार मागणी

"वादा तोडल्याप्रकरणी महायुती सरकारवर गुन्हा दाखल करा!" – निजलगावच्या बैठकीत शेतकऱ्यांची जोरदार मागणी
"वादा तोडल्याप्रकरणी महायुती सरकारवर गुन्हा दाखल करा!" – निजलगावच्या बैठकीत शेतकऱ्यांची जोरदार मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

पैठण दि ८ जून :– विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने न पाळणाऱ्या महायुती सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी ठाम मागणी पैठण तालुक्यातील निजलगाव येथे पार पडलेल्या ग्रामसभेत करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 'क्या हुआ तेरा वादा?' या आंदोलनांतर्गत झालेल्या बैठकीत ही मागणी जोरदारपणे समोर आली.

या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी, "महायुती सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न करता आमच्याशी फसवणूक केली आहे," असा आरोप करत शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

दानवे म्हणाले की, "जलजीवन मिशनच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून आर्थिक तरतुदीअभावी अनेक योजना अपूर्ण अवस्थेतच थांबल्या आहेत. घरकुलासाठी मिळणारे अनुदान अपुरे आहे आणि तेही वेळेवर मिळत नाही."

तसेच त्यांनी मराठवाड्याच्या सिंचन प्रश्नावरून सरकारवर टीका करत सांगितले की, "मराठवाडा वॉटर ग्रीड केवळ घोषणांच्या पातळीवर आहे. सर्वेक्षणासाठीही निधी मिळालेला नाही. गोदावरी व कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्याच्या घोषणा केवळ दिखावा आहेत."

शेतकरी वर्ग 'क्या हुआ तेरा वादा?' या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून गावोगाव दानवे यांच्या भेटीगाठींना गर्दी वाढत आहे. शेतकरी म्हणतात, "आम्ही सरकारवर विश्वास ठेवून मतदान केलं, पण आता आमचं भविष्यच धोक्यात आलं आहे."

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, शाखाप्रमुख दिलीप मोगल, सरपंच विजय आडे यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकारी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.