नदीला नवसंजीवनी! महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम जलद गतीने मार्गी

महाराष्ट्र वाणी .Com
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 03 जून:
शहरातील ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेल्या सुखना नदीचे पुनरुज्जीवन महापालिकेने गांभीर्याने हाती घेतले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आणि उपायुक्त विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २० मार्च २०२५ पासून या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे.
पूर्व भागातून वाहणारी आणि पावसाळ्यात सक्रिय असलेली सुखना नदी अतिक्रमण, सांडपाणी व कचऱ्यामुळे नाल्यात रूपांतरित झाली होती. या पार्श्वभूमीवर, नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि स्वच्छता यांसारखी महत्त्वाची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे ३ ते ४.५ किमी अंतरापर्यंत काम पूर्ण झाले असून, यामध्ये तीन पोकलेन आणि चार जेसीबी यंत्रांचा सक्रिय वापर केला जात आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मोहीम नागरिकांच्या सहकार्याने गतिमान झाली आहे. यासोबतच नदीच्या दोन्ही काठांवर देशी वृक्षांची लागवड करून हरित पट्टा विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे परिसराचा पर्यावरणीय समतोल राखला जाईल तसेच जैवविविधतेला चालना मिळेल.
पुनरुज्जीवनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक – ५ जून रोजी भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि. ५ जून रोजी सुखना नदी स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. या मोहिमेत नदीतील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा गोळा करून नदी स्वच्छ केली जाणार आहे. यासाठी महापालिकेतील सर्व विभाग सहभागी होणार आहेत.
महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी नागरिक, सेवाभावी संस्था, शाळा-विद्यापीठांतील विद्यार्थी, रुग्णालये, बँका व विविध संस्था यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सुखना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प केवळ नदीसाठीच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगरच्या उज्ज्वल, पर्यावरणपूरक भविष्याचा पाया ठरेल.