जलशक्ती अभियान पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

जलशक्ती अभियान पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
जलशक्ती अभियान पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर, दि.२५( औरंगाबाद) :- येत्या पावसाळ्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत जिरवून प्रत्येक पाणलोटक्षेत्रनिहाय विकास करावा, जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, ग्रामिण पाणी पुरवठा उपअभियंता श्रीमती एम.जी. नांद्रे, सहा. पशु आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर.डी. इंगळे, उपजिल्हाधिकारी रोहयो रुपेश सिंगारे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनिषा हराळ –मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा यांनी यावेळी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचाही आढावा घेतला. जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ देता कामा नये. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवता आला पाहिजे यासाठी विविध जलोपचार करावे लागतील. त्यात लहान लहान समतल चर, शोष खड्डे, बंडिंग, भूमिगत रिचार्ज शाफ्ट, लहान लहान बंधारे, नाला खोलीकरण, विहीरींचे पुनर्भरण असए विविध उपक्रम राबविता येतील. या उपाययोजना विविध विभागांमार्फत राबविण्यात येत आहेत. त्यात जलयुक्त शिवार सारख्या अभियानातील कामांचाही समावेश आहे. त्या त्या भागातील पाणलोट क्षेत्रनिहाय पाणी अडवून ते ते क्षेत्र विकसीत करावे. पावसाचे पडणारे पाणी जमिनीत जिरवण्याचा निर्धार आपण केला पाहिजे. जलसंचय जन भागिदारी या उपक्रमाचा भाग म्हणून या प्रत्येक उपक्रमात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले.