इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ; अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्यात बदल

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ; अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्यात बदल

महाराष्ट्र वाणी.Com

पुणे दि ३ जून :- राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली असून, विद्यार्थ्यांना आता ५ जून २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोट्यांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे.

राज्यभर अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असून, आतापर्यंत १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. काही तांत्रिक व धोरणात्मक बदलांमुळे अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्यात अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देणे आवश्यक ठरल्याने, ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

  

 अल्पसंख्याक कोट्यात महत्त्वाचे बदल :

अल्पसंख्याक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ५०% जागा अल्पसंख्याक कोट्यांतर्गत राखीव असतील.

या कोट्यांतर्गत जागा गुणवत्तेच्या आधारे, सर्वसाधारण नियमित तीन फेऱ्या पूर्ण होईपर्यंत शाळा व्यवस्थापन भरू शकतील.

पहिल्या फेरीनंतर जागा रिक्त राहिल्यास त्या जागा सर्वसाधारण कोट्यात प्रत्यार्पित करण्याचा पर्याय खुला असेल.

जर दुसऱ्या फेरीत अल्पसंख्याक कोट्यात अर्जदार उपलब्ध असतील, तर त्यांना प्रथम प्रवेश देण्यात येईल.

प्रत्यार्पण पूर्णतः ऐच्छिक असेल; कोणत्याही संस्थेला बंधनकारक नसेल.

 इनहाऊस कोट्याबाबत नवीन नियमावली :

खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना १०% जागा इनहाऊस कोट्यासाठी राखीव असतील.

या कोट्यांतर्गत निवड गुणवत्ता (Merit) आधारे ऑनलाइन पद्धतीने होईल.

माध्यमिक शाळा ज्या आवारात उच्च माध्यमिक शाळा आहे, अशा शाळेतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या कोट्यास पात्र असतील.

सर्वसाधारण दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येणार असून, त्यानंतर रिक्त जागा प्रत्यार्पित करणे बंधनकारक ठरेल.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेष बाबी :

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इनहाऊस कोटा ५०% ठेवण्यात आला आहे.

या कोट्यासाठी केवळ राज्यातील शासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतील.

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी एकत्रित संस्थांमध्ये "एक युनिट" म्हणून कोटा ठरवला जाईल.

इतर जिल्ह्यांमध्ये महसुली जिल्हानिहाय संबंधित संस्थेच्या शाळा व महाविद्यालये "एक युनिट" मानली जातील

या सर्व बदलांमुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी नव्याने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करून अर्ज सादर करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

 महत्वाची तारीख:

 नोंदणीची अंतिम तारीख : ५ जून २०२५