"विष्णुपुरी पुलाची भिंत कोसळली! "आता याविरोधात बोलणारेही 'भाड्याचे तट्टू' ठरणार का, मुख्यमंत्री महोदय? – काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल"
महाराष्ट्र वाणी
मुंबई, दि. ९ :- नांदेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याच्या घटनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. "आता याविरोधात बोलणारेही 'भाड्याचे तट्टू' ठरणार का, मुख्यमंत्री महोदय?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
सपकाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या दुर्घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी हा अपघात सरकारच्या निष्काळजी कारभाराचे गंभीर उदाहरण आहे. पुलाची संरक्षण भिंत कोसळल्याने सार्वजनिक बांधकामांच्या दर्जाबाबत आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यांनी नमूद केले की, नागपूर–सोलापूर महामार्गावरील नांदेडमधील रस्ते आणि पुलांची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थी, रुग्ण, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना धुळीचे रस्ते, वाहतूक कोंडी आणि निकृष्ट दर्जाच्या कामांचा त्रास सहन करावा लागत आहे.
ज्या मार्गावर एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण पॉलिटेक्निक, सहयोग महाविद्यालय तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक आणि आरोग्य संस्थांचा वावर आहे, त्याच मार्गावरील ही दुर्घटना अधिक गंभीर असल्याचेही त्यांनी म्हटले.
"ही केवळ पुलाची संरक्षण भिंत कोसळलेली नाही, तर सरकारच्या तथाकथित विकासाच्या दाव्यांची भिंतही कोसळली आहे," असा घणाघाती आरोप करत सपकाळ यांनी या घटनेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि रखडलेल्या महामार्ग व पुलांच्या कामांना तातडीने गती देण्याची मागणी केली.