वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाहणी दौऱ्यात ग्वाही
महाराष्ट्र वाणी न्युज
जळगाव, दि. १२ जून :– बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली व नुकसानीची पाहणी केली.
गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील धानवड, उमाळा-देवरी आणि दापोरा या गावांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, पंचनामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला न्याय व मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या दौऱ्यात निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तहसीलदार शितल राजपूत यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे सुरू करून मदत पुरवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
शेतकऱ्यांनी देखील आपली व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडत त्वरीत मदतीची मागणी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
➤ वाचत रहा तुमचं विश्वासार्ह ग्रामीण बातमी पोर्टल