सिल्लोड पंचायत समितीत कृषी सप्ताहाचा दिमाखात समारोप; प्रगत शेतकरी व विद्यार्थ्यांचा सन्मान
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड | प्रतिनिधी दि १० :- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृषी विभागामार्फत १ ते ७ जुलै या कालावधीत साजरा करण्यात आलेल्या 'कृषी सप्ताहाचा' समारोप सोहळा शुक्रवारी (१० जुलै) पंचायत समिती सभागृह, सिल्लोड येथे उत्साहात पार पडला. यावेळी प्रगतिशील शेतकरी व विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे, सन्मानचिन्ह, शाल, रोपे आणि फवारणी सेफ्टी किट देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि पंचायत समिती सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. आणि गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांची होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सिल्लोडच्या सभापती सौ. अनिता सुरेश बनकर होत्या.
आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन
कृषी सप्ताहानिमित्त तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कृषी दिन, महिला शेतकरी दिन, युवा शेतकरी दिन, फलोत्पादन दिन, वृक्षदिंडी, निबंध स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळावे, ठिबक सिंचन व फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, पीक संरक्षण, माती परीक्षण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. महिला बचत गटांसाठी कृषीपूरक व्यवसायाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
१५ प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव
कार्यक्रमात वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र, रोपे आणि फवारणी सेफ्टी किट देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
"शेतीला उद्योगाचा दर्जा द्या" – सौ. अनिता बनकर
अध्यक्षीय भाषणात सभापती सौ. अनिता बनकर म्हणाल्या, "आज शेती केवळ पारंपरिक व्यवसाय राहिलेली नाही. तरुणांनी शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, प्रक्रिया उद्योग आणि थेट बाजारपेठेचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा आणि कृषी यांत्रिकीकरणासारख्या शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे."
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य केशवराव तायडे, पंचायत समितीचे उपसभापती भगवान आहेर, सदस्य वृषाली मिरकर, नारायण खोमणे, सुरेश बनकर, सुदाम बनसोड, अनिल खरात, अंबादास शिंदे, एकनाथ हिवाळे, आत्माराम पाडळे, कृषी अधिकारी सुनील सूर्यवंशी, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिता सनान्से, कृषी विस्तार अधिकारी जोगेंद्र अहिरराव, राजेंद्र लांडगे, विश्वास बनसोडे, विस्तार अधिकारी पंचायत साहेबराव शेळके, विस्तार अधिकारी शिक्षण राजू फुसे, विस्तार अधिकारी सांख्यिकी केवलसिंग पाटील, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) गट समन्वयक केशवकांत बुलबुले, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक गटविकास अधिकारी आशिष मस्के यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार अधिकारी विश्वास बनसोडे यांनी केले.
कृषी सप्ताहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून आगामी हंगामात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.