"मोदींनी मला आणि रवीश कुमारला मुलाखत द्यावी!" – संजय राऊतांचा थेट सवाल

"मोदींनी मला आणि रवीश कुमारला मुलाखत द्यावी!" – संजय राऊतांचा थेट सवाल

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, ९ जून :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान दिले आहे की, त्यांनी स्वतः रवीश कुमार व त्यांच्यासारख्या पत्रकारांसमोर खुल्या संवादासाठी सामोरे यावे. गेल्या ११ वर्षांत पंतप्रधानांनी देशासाठी काय केले हे जनतेसमोर मांडावे, असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, “पंतप्रधान मोदी सतत परदेश दौऱ्यावर असतात, मात्र देशातल्या जनतेला केवळ खोटी आश्वासने दिली गेली. त्यांनी जर खरेच देशासाठी काही महत्त्वपूर्ण काम केले असेल, तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावे. मी, रवीश कुमार, राजदीप सरदेसाई किंवा संजय सिंह यांसारख्या काही मोजक्या पत्रकारांकडे ते सामोरे गेले पाहिजे. आम्ही जनतेच्या मनातील खरे प्रश्न विचारू आणि त्यांना मोकळेपणाने उत्तर द्यायची संधीही मिळेल.”

संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरही घणाघाती टीका केली. ते म्हणाले, “हे लोक फक्त कॉपी करून आणि लबाडीच्या मार्गाने सत्तेवर आले आहेत. मिंधे गटाचे मंत्री वारंवार खोटे बोलतात. त्यांच्या आमदारांनी आणि नेत्यांनी देशासमोर काहीही भरीव काम केलेले नाही. राहुल गांधींच्या लेखात याच गोष्टींचा उल्लेख आहे.”

निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या घरगुती वादांवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “मी कुणावरही वैयक्तिक पातळीवर टीका करणारा नाही. राजकीय मतभेद असू शकतात, पण ते घरातले वाद होऊ नयेत. घराचे भान ठेवून राजकारण करणे हीच महाराष्ट्राची परंपरा आहे.”

शेवटी राऊत म्हणाले, “लोकशाहीसाठी आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते. विरोधकांचा आवाज दाबणं, हीच पंतप्रधानांची ११ वर्षांची कमाई आहे. खोटं बोलण्याच्या स्पर्धेत नोबेल पुरस्कार असता, तर मोदींचीच निवड झाली अस्ती"