पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधून जिल्हाभरात वृक्ष लागवडीस प्रारंभ; वृक्ष जगवा, माणूस जगेल- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.५ :- शुद्ध हवा, शुद्ध पाणी जे जगण्यासाठी नितांत आवश्यक आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. पैसा, प्रॉपर्टी, मालमत्ता आपल्या मुलांसाठी मागे ठेवतांना त्यांच्यासाठी शुद्ध हवा, पाणी यांचीही तरतूद करुन ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्ष लावा, वृक्ष जगवा म्हणजेच माणूस जगेल, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज वृक्ष लागवडीसाठी आवाहन केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज जिल्ह्यात वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. जटवाडा, रहाळ पट्टीतांडा येथे वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. त्यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत व शहर हद्दीतही वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. जटवाडा रहाळ पट्टीतांडा येथे वन विभाग, १३६ इको बटालियन यांच्यावतीने ३१ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमात गायत्री परिवार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, एनसीसी इ. सहभागी झाले होते. सरपंच छाया चव्हाण, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, कर्नल निर्देश साहा, लेफ्ट. कर्नल अमित प्रभू, मेजर अनिरुद्ध काळे, मेजर प्रमोद बहिरथ, सुभेदार मेजर चंद्रमा सिंग, सुभेदार विष्णू बढिया, नायब सुभेदार देवकर, तहसिलदार रमेश मुनलोड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. वन विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या क्षेत्रावर इको बटालियन तर्फे ३ लाख वृक्ष लागवड करण्यात येत असून त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. पहिल्या दिवशी ३१ हजार वृक्ष लागवड करण्यात आली, अशी माहिती यावेळी देण्यात आली. येथे घनवन पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात येत आहे.
यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने १०० तर नगरपालिका, नगर पंचायत यांनी २०० वृक्ष लागवड करुन ते जगविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याचाही प्रारंभ आज करण्यात आला. त्यासाठी वृक्ष दिंडी काढून जनजागृतीही करण्यात आली.