"राज्यात मान्सून रखडला; 14 जूनपर्यंत तापमान वाढीचा इशारा – पेरणीला घाई नको"

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, दि. 9 जून :- गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात मान्सूनचा प्रवास थांबलेला असून, तो किमान 15 जूनपर्यंत रखडलेलाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याचा परिणाम म्हणून 14 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे.
पश्चिम किनारपट्टी वगळता विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर उर्वरित विदर्भात 40 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि खानदेशातही 40 अंशाच्या आसपास तापमान राहण्याचा अंदाज आहे.
या कालावधीत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहणार असून, पावसाच्या शक्यता केवळ दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह काही भागांपुरती मर्यादित राहतील. विशेषतः दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अशा प्रकारचा पाऊस पडू शकतो. अन्य भागांमध्ये केवळ विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे.
मान्सून रखडल्यामुळे आणि तापमानात वाढ झाल्यामुळे, कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना, पेरणीसाठी अजून थोडी वाट पाहण्याचे आवाहन केले आहे. पेरणीची घाई केल्यास पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.