"भाजपचा मतदान चोरी पॅटर्न उघड; महाराष्ट्र निवडणुकीतील फिक्सिंग चौकशीसाठी काँग्रेस आक्रमक, १२ जूनला मशाल मोर्चे"
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, दि. ७ जून :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदान घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, भाजपावर ‘मतदान चोरी’चा गंभीर आरोप केला आहे. “२०२४ च्या निवडणुकीत अचानक वाढलेले मतदान, बोगस मतदार व निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत. राहुल गांधी यांच्या लेखामुळे देशभरात राजकीय भूकंप झाला असून, निवडणूक फिक्सिंगची चौकशी झालीच पाहिजे,” असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, “२०१९ ते २०२४ या पाच वर्षांत मतदारसंख्या ३१ लाखांनी वाढली, पण फक्त पाच महिन्यांत ४१ लाखांनी कशी वाढली? यातील गूढ उकलणे गरजेचे आहे.” त्यांनी निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीत दिसणाऱ्या विसंगतींकडेही लक्ष वेधले. “२०२४ मध्ये प्राथमिक मतदान ५८.२२% होते, पण अंतिम मतदान ६६.५% जाहीर करण्यात आले — तब्बल ८ टक्क्यांची वाढ! पूर्वी कधीच इतकी तफावत नव्हती,” असे ते म्हणाले.
काँग्रेसकडून या प्रकरणाची आकडेवारीसह चौकशीची मागणी करण्यात आली असतानाही निवडणूक आयोग गप्प का? आणि आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का देत आहेत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘मतदान चोरीचा महाराष्ट्र पॅटर्न’ देशभरात राबविण्याचे षडयंत्र?
हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “हा पॅटर्न बिहार विधानसभा, मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही वापरण्याचे षडयंत्र सुरू आहे.”
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लोकशाही रक्षणासाठी उभा राहत १२ जून रोजी संपूर्ण राज्यभर मशाल मोर्चांचे आयोजन केले आहे. सपकाळ स्वतः गडचिरोलीतील मोर्चात सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी आमदार कुणाल पाटीलही उपस्थित होते.
लोकशाहीवरील घाला, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय, आणि ‘सत्तेच्या’ फिक्सिंगवर उठलेले प्रश्न – यामुळे आगामी काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.