"क्या हुआ तेरा वादा?" - शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा, सरकारला खडसावत विचारला जाब!

"क्या हुआ तेरा वादा?" - शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा, सरकारला खडसावत विचारला जाब!
"क्या हुआ तेरा वादा?" - शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा, सरकारला खडसावत विचारला जाब!

महाराष्ट्र वाणी न्युज 

संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ११ जून:- "क्या हुआ तेरा वादा?" या घोषणांनी आज संभाजीनगरातील रस्ते दणाणले. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वाऱ्यावर गेल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढत सरकारला जाब विचारला.

शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत तब्बल २२५ हून अधिक ट्रॅक्टरसह मोर्चा निघाला. अंबादास दानवे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चाचे नेतृत्व केले.

मोर्चादरम्यान "क्या हुआ तेरा वादा?", "शेतकऱ्यांना भाव मिळालाच पाहिजे", "सातबारा कोरा झाला पाहिजे" अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची ध्वनीचित्रफीतही ट्रॅक्टरवर लावण्यात आली होती.

मोर्चात सहभागी सर्व शिवसैनिक शेतकरी वेषात सहभागी झाले होते. किसानसेना जिल्हाप्रमुख नाना पळसकर पारंपरिक शेतकरी वेशात सहभागी होत कर्जमाफीत दिरंगाईवर रोष व्यक्त केला.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, "महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आज १५०० रुपयेही वेळेवर मिळत नाहीत."

मोर्चाच्या शेवटी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नावाने निवेदन देण्यात आले.

निवेदनातील ठळक मुद्दे:

शेतकऱ्यांना कर्जमाफी व पीकविमा अजूनही अपूर्ण

४५ हजार पाणंद रस्त्यांचे आश्वासन केवळ कागदावर

महिलांना वेळेवर सन्मानराशी न मिळाल्याचा आरोप

वृद्ध, विद्यार्थी व बेरोजगारांसाठी दिलेली आश्वासने हवेत विरली

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पावर सरकारचे दुर्लक्ष

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, "सरकारने जर त्वरित उपाययोजना केल्या नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन उग्र रूप धारण करेल."

या आंदोलनात शिवसेना, किसानसेना, कामगारसेना व युवासेनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. "क्या हुआ तेरा वादा?" ही हाक आता महाराष्ट्रभर सरकारला झोप उडवणारी ठरणार हे निश्चित.