"एल निनोचा इशारा! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आताच सावध व्हा; संकटाला संधीत बदलण्याचा मंत्र – अतुल चव्हाण"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) दि १५ :- प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने निर्माण झालेल्या ‘एल निनो’ परिस्थितीची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील पावसाच्या स्वरूपावर होण्याची शक्यता असून खरीप हंगामातील पिकांसाठी हा सावधतेचा इशारा असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
अतुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस वेळेवर सुरू होऊनही मध्येच दीर्घ खंड पडू शकतो, तर काही भागांत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्य पिकांना ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्यास मोठा फटका बसू शकतो.
याशिवाय कमी पावसामुळे मावा, तुडतुडे आणि थ्रिप्स यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी अतुल चव्हाण यांचा चार सूत्री सल्ला
१) कमी कालावधीच्या जातींची निवड करा :
अनिश्चित पावसाचा विचार करून कमी पाणी लागणाऱ्या व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या जातींची निवड करावी.
२) आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा :
कापूस किंवा तुरीसोबत मूग, उडीद यांसारखी आंतरपीके घेतल्यास जोखीम कमी होते आणि उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध राहतो.
३) गादीवाफ्यावर पेरणी करा :
अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाणी निचरा होतो, तर पावसाचा खंड पडल्यास ओलावा टिकून राहतो.
४) पाणी व्यवस्थापन व पीक विमा घ्या :
ठिबक, तुषार सिंचन, शेततळ्यांची स्वच्छता आणि पीक विमा यावर विशेष भर द्यावा.
"एल निनो हे संकट असले तरी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेळेवर घेतलेले निर्णय यामुळे त्याचे परिणाम कमी करता येऊ शकतात. तयारी असेल तर संकट लहान होते," असे अतुल चव्हाण यांनी नमूद केले.
वाचकांनो, तुमच्या भागात एल निनोच्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी कोणती तयारी सुरू आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
शेतकऱ्यांच्या हिताच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि मार्गदर्शनासाठी ‘महाराष्ट्र वाणी’ला फॉलो करा!