"सातबारा कोरा" साठी बच्चू कडूंचा एल्गार; ५ जुलैपासून १३८ किमी पदयात्रेला सुरुवात

महाराष्ट्र वाणी न्युज
अमरावती (प्रतिनिधी) दि २४ जून :- शेतकरी, मजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण व अन्य वंचित घटकांच्या न्यायहक्कांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा मैदानात उतरले आहेत. ‘सक्तीची कर्जवसुली थांबवा, तात्काळ कर्जमाफी द्या’ या प्रमुख मागण्यांसाठी ५ जुलैपासून ‘सातबारा कोरा करा’ ही पदयात्रा पापळ येथून सुरू होणार आहे.
पडताळलेली १३८ किमीची ही लोकचळवळीची यात्रा चिलगव्हाण येथे समारोप होईल. साहेबराव करपे यांच्या आत्महत्येने हललेल्या या गावात शेवटचा टप्पा असेल, हे या यात्रेचं प्रतीकात्मक महत्त्व अधोरेखित करतं.
यात्रेचे महत्त्वाचे टप्पे
उंबरडा बाजार, बोदेगाव, दारव्हा, तिवरी, तूपटाकळी, काळी दौलत व गुंज या ठिकाणी सभा व संवाद कार्यक्रम होतील. यात्रेच्या दरम्यान शेतकरी आत्महत्यांना आळा घालणाऱ्या धोरणांची मागणी, विधवा व दिव्यांगांसाठी रोजगार योजना, मनरेगामध्ये सुधारणा आणि तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी आदी मुद्दे मांडले जातील.
बच्चू कडू यांची भावनिक साद
“ही यात्रा तुमच्या पोटासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबाच्या अस्तित्वासाठी आहे. पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून एकत्र या. मतदान कोणालाही करा, पण कष्टकरी माणसासाठी एकत्र उभं राहा.”
अन्नत्याग आंदोलनानंतर आता थेट गावागावात चालत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्धार करत, ही यात्रा केवळ राजकीय नव्हे, तर लोकहिताची चळवळ ठरणार आहे.