मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा: ३० जून २०२६ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित!

मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा: ३० जून २०२६ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित!
मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा: ३० जून २०२६ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित!

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई (प्रतिनिधी) दि ३१ :– राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आंदोलक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कर्जमाफीसंदर्भात गठीत समिती एप्रिल २०२६ पर्यंत आपली शिफारस सादर करेल. त्या अहवालाच्या आधारे पुढील प्रक्रिया पूर्ण करून तीन महिन्यांच्या आत म्हणजे ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी अमलात आणली जाईल.”

तसेच त्यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “जर आता मदत दिली नाही, तर शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणी करणे कठीण होईल. म्हणूनच ३२ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या वितरणाला प्राधान्य दिले जात आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यातील ८,००० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, या आठवड्याअखेर आणखी १८,५०० कोटी रुपयांचे वितरण होणार आहे. पंधरा दिवसांत ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदत थेट पोहोचेल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश कुमार तसेच शेतकरी नेते ओमप्रकाश (बच्चू) कडू, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर, गिरीश दाभाडकर आणि अजित नवले आदी उपस्थित होते.

🔸 महाराष्ट्र वाणीचा निष्कर्ष:

शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे, पण प्रत्यक्ष कर्जमाफीची अंमलबजावणी वेळेत होते का — हेच आता शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहणार आहेत! 🌾