हास्य कवितांनी मनपा अधिकारी कर्मचारी लोटपोट! मनपा स्थापना दिना निम्मित हास्य कवी संध्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११

महानगरपालिकेच्या ४३ व्या स्थापना दिना निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  मनपा मुख्यालय येथे मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार हास्य कवी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मां.अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे,यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी उप आयुक्त विकास नवाळे, लखीचंद चव्हाण,नंदकिशोर भोंबे,सहायक आयुक्त सविता सोनवणे,हास्य कवी डॉ.स्वप्नील चौधरी ,अविनाश भारती,निलेश चव्हाण, ध.सु.जाधव, कु.गुंजन पाटील ,सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू,अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

    कार्यक्रम मध्यान्ह मध्ये मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहूळे यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.यावेळी मां.उप आयुक्त विकास नवाळे यांनी झाडे बोलू लागली तर या सामाजिक विषयावर एक सुंदर कविता सादर केली.

झाडे बोलू लागली तर ,

त्यांनाही सांगता येतील त्यांच्या जन्माच्या कथा व आयुष्याच्या व्यथा,झाडानाही मिळेलच की हक्क त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ,अन् त्यांच्यावर वार करणाऱ्या प्रत्येक कुऱ्हाडीला नाही म्हणण्याचा..

 झाडांवरही होतंच असतो की दरोरोज अत्याचार , 

कुणीतरी कुस्करतो एखाद्या नवजात कळीला , 

तर कुणी चुरगाळतो वयात आलेल्या वेलीला ,हल्ली तरण्याबांड झाडांच्याही होतच असतात दरोरोज कत्तली , 

पण त्यांची वकिली करण्यासाठी एखाद्या झाडलाच बोलत व्हावं लागेल ,

अन् त्यांच्या झाड नावाच्या समाजासाठी सुद्धा एखादा खटला लढवावाचं लागेल 

झाडं बोलू लागली तर  

एखादं गाण म्हणतीलचं पक्ष्यांसाठी , चार शब्द आभाराचे सांगतीलही त्यांच्यासाठी राबणाऱ्या एखाद्या माणसासाठी,पण झाडं कधीच करणार नाही भाव फांदीवरच्या फळांचा,अन् कधीच सांगणार नाही हक्क झाडाखालच्या सावलीचा..

  हास्य कवींनी एकापेक्षा एक हास्य कविता सादर करून उपस्थिताना पोट धरून हसायला लावले.यात विडंबन कवितांचा ही समावेश होता.यात निलेश चव्हाण यांनी 

सध्याच्या राजकारणावर

तिघांची जोड लागत नसते 

दोघांचेच तेवढे बरे असते,

अन जास्तच जमू लागले दोघांचे 

तर मुक्काम पोस्ट “दरे “ असते.

संख्याबळावर जागा ठरते 

संख्येनुसार शब्द बोलला जातो,

अन जास्तच आवाज वाढला तर 

माईक हिसकावून घेतला जातो.ही वात्रटिका सादर करून या कार्यक्रमांत अजूनच रंगत आणली.कार्यक्रमांचे सूत्र संचालन सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले.