“कांद्याच्या अश्रूंनी पेटला समृद्धी महामार्ग!”; अंबादास दानवेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा ऐतिहासिक चक्काजाम 🚜🔥
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ :- कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत समृद्धी महामार्गावर ऐतिहासिक आंदोलन छेडले. आमदार Ambadas Danve यांच्या नेतृत्वाखाली जांबरगाव इंटरचेंज येथे शिवसैनिकांनी जोरदार चक्काजाम आंदोलन करत समृद्धी महामार्ग काही काळासाठी ठप्प केला.
“शेतकऱ्यांच्या घामाला आणि कांद्याच्या अश्रूंना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला. घोषणाबाजी, हातात फलक आणि रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाने हे आंदोलन उभारले. आंदोलनादरम्यान सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण समृद्धी महामार्ग दणाणून गेला.
आंदोलनकर्त्यांनी सरकारसमोर चार प्रमुख मागण्या ठेवल्या. त्यामध्ये नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करणे, कांद्याला किमान ₹२,००० हमीभाव आणि ₹१,५०० अनुदान देणे, कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवणे तसेच खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, यांचा समावेश होता. याशिवाय कांदा चाळीसाठी ७५ टक्के अनुदान आणि दर्जेदार बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.
आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिल्याने वातावरण चांगलेच तापले होते.
“कांद्याला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
👉 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार काय निर्णय घेणार? महाराष्ट्राच्या नजरा आता या आंदोलनाकडे लागल्या आहेत!