“हिंदी सक्तीविरोधात मराठी शक्तीचा एल्गार!” — गिरगाव चौपाटीवरून ६ जुलैला भव्य मोर्चा; राज ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, ( प्रतिनिधी) दि. २६ जून :— “पहिलीपासून हिंदी सक्ती होऊ देणार नाही!” अशा ठाम शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी मराठी जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की,
“या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, तो फक्त आणि फक्त मराठी माणसाचा मोर्चा असेल. ‘मराठी’ हाच आमचा अजेंडा असेल आणि या लढ्याचं नेतृत्व देखील मराठी माणूसच करेल.”
ते पुढे म्हणाले की,
“सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय चाललं आहे ते! ६ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्राची ताकद गिरगाव चौपाटीवरून दिसेल. आणि मला हेही पाहायचं आहे की, या लढ्यात कोण सामील होतंय आणि कोण नाही!”
शिक्षण आणि भाषा क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा
राज ठाकरे यांनी सांगितले की, लवकरच शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी संवाद साधण्यात येणार असून, विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांनाच या मोर्चासाठी आवर्जून आमंत्रण दिलं जाईल.
सर्वपक्षीय सहभागाचं आवाहन
राज ठाकरे म्हणाले की,
“हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधणार आहोत. कोणताही वाद किंवा भांडण नको — कारण त्याहून मोठा आहे महाराष्ट्र!”