आरोग्यसेवेचा दर्जा उंचावणार! - फुले व आयुष्मान योजनेच्या आढावा बैठकीत मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई | १९ जून :- जूनराज्यातील नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि सहजपणे रुग्णालयीन सेवा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' व 'आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील वरळी येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात दि १८ रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर होते.
या वेळी रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख व्हावी यावर भर देण्यात आला. उपचारांची प्रक्रिया गतिमान व्हावी, सुपरस्पेशालिटी सुविधा राज्यात उपलब्ध करून द्याव्यात आणि नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने राबवण्याचे निर्देश मंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा शासकीय रुग्णालये आणि इतर सक्षम वैद्यकीय संस्थांना लवकरच या योजनांतर्गत सामील करून घेण्याची कार्यवाही करण्यासही आदेश देण्यात आले. योजनेचा लाभ केवळ गरजू घटकांपुरता मर्यादित न ठेवता, स्वस्त धान्य दुकानांचे चालक, सरकार सेवा केंद्र चालक यांसारख्या विविध घटकांनाही या योजनांमध्ये समाविष्ट करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्याचे निर्देशही देण्यात आले.
योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी ‘अंगीकृत रुग्णालये’, ‘आरोग्य मित्र’, ‘क्षेत्रीय अधिकारी’, ‘जिल्हा समन्वयक’ आणि मुख्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तपासली जाणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना ‘बाळासाहेब ठाकरे पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी लवकरच विशेष सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी जाहीर केले.
या उपक्रमांमुळे राज्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावेल आणि गरजू नागरिकांना जलद व प्रभावी वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला.