हजचा सर्वात महत्त्वाचा दिवस – 'यौमे अरफा' आज; अराफातच्या मैदानात इबादतीत गुंतले लाखो हाजी

महाराष्ट्र वाणी न्युज
आज ५ जून, गुरुवार. इस्लामी कैलेंडरनुसार जिलहिज्जा महिन्याची ९वी तारीख. आजचा दिवस "यौमे अरफा" म्हणून ओळखला जातो. वर्षातील सर्वात पुण्यवान आणि फजीलत पूर्ण दिवस म्हणून याचा मोठा मान आहे.
हजमधील सर्वात महत्त्वाचा भाग आजच असतो. अराफातच्या मैदानात आजचा संपूर्ण दिवस घालवणे, हेच हजाचे सार आहे. हजच्या इतर कृत्यांमध्ये काही त्रुटी झाल्यास त्याची कजा (भरपाई) किंवा कफ्फारा (प्रायश्चित्त) देता येतो, पण जर कोणीतरी आजच्या दिवशी अराफातच्या मैदानात पोहोचू शकला नाही, तर त्याचा हजच होणार नाही.
आज सूर्योदयानंतर सर्व हाजी मिना येथून अराफातच्या दिशेने निघतात. कोणी पायी, कोणी बसने, तर कोणी ट्रेनने प्रवास करतो. सर्वजण दोन पांढऱ्या चादरींमध्ये लिपटलेले असतात. कोणताही भेदभाव नसतो – सगळे समान. प्रत्येकाच्या ओठांवर एकच घोषणा:
"लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, ला शरीका लका लब्बैक, इन्नल हम्दा वन्नेमता लका वल मुल्क, ला शरीका लक"
मिना ते अराफातचे अंतर सुमारे १० किलोमीटर आहे. जे हाजी थेट मक्केहून येतात, त्यांना २२ किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते.
अराफातच्या मैदानात संपूर्ण दिवस इबादतीत घालवला जातो. झोहर आणि अस्रच्या नमाज एकत्र करून दोन-दोन रकात वाचल्या जातात आणि इमाम साहेब यांचा खुतबा ऐकला जातो.
हा खुतबा मस्जिदे निमरा या मशिदीतून दिला जातो. ही मस्जिद अराफातच्या सीमेवर "निमरा" नावाच्या ठिकाणी आहे. हिचा काही भाग अराफातच्या हद्दीतसुद्धा येतो.
अल्लाहचे रसूल हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी हजच्या वेळी याच मैदानात ऐतिहासिक खुतबा दिला होता. तेव्हा ते एका उंटावर आरूढ होते, जो मैदानातील एका डोंगरावर उभा होता. त्या डोंगराला "जबल-ए-रहमत" म्हणतात. त्या डोंगराच्या पायथ्याला आणि मस्जिदे निमरा दोन्हींचे दृश्य अद्याप हज दरम्यान पाहायला मिळते.
संपूर्ण मैदानभर नीमाची झाडं लावलेली असतात आणि दिवसभर हाजींवर हलक्याफुलक्या पाण्याच्या फवाऱ्यांचा शिडकावा केला जातो, जेणेकरून उष्णतेपासून थोडा आराम मिळावा.
सूर्यास्तापर्यंत हाजी इथे इबादत करतात. सूर्य मावळताच मग्रिबची नमाजेची वेळ होते, पण हाजी मग्रिबची नमाज न पढता ताबडतोब मुजदलिफाकडे रवाना होतात, जे अराफातपासून ७ किलोमीटरवर आहे.
मुजदलिफाला पोहोचल्यावर हाजी मग्रिब आणि ईशा या दोन्ही नमाजा एकत्र वाचतात, जेवतात आणि मग थेट जमिनीवर चटई पसरून झोपतात. दिवसभराचा थकवा अंगात भरलेला असतो आणि तिथे झोप एकदम गाढ लागते.