वीज दर कपात! राज्य सरकारकडून मोठा दिलासा; पाच वर्षांत २६% दरवाढीऐवजी कपात होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वीज दर कपात! राज्य सरकारकडून मोठा दिलासा; पाच वर्षांत २६% दरवाढीऐवजी कपात होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई (प्रतिनिधी) दि २५ जून :- राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) दिलेला ऐतिहासिक निर्णय जाहीर करत सांगितले की, पुढील पाच वर्षांत वीज दरांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २६ टक्क्यांची कपात होणार आहे. त्यातील पहिल्या वर्षीच ग्राहकांना दहा टक्के दरकपतीचा थेट लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर ही माहिती देताना म्हटले की, “राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावरच MERC ने हा निर्णय दिला असून, आम्ही आयोगाचे आभार मानतो.”

 घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना लाभ

वीजदर कपातीचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनाही मिळणार आहे. विशेषतः १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक हे राज्यातील एकूण ग्राहकांच्या ७० टक्के आहेत आणि त्यांना सर्वाधिक लाभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

 हरित ऊर्जा आणि सौर कृषी वाहिनी योजना यामुळे शक्य झालेली कपात

वीज दर कपातीमागील आर्थिक गणित सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' युद्धपातळीवर राबवली जात आहे. शिवाय, हरित ऊर्जेच्या वीज खरेदी करारांमुळे खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे महावितरणकडून वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडता आला आणि तो मान्यही झाला.”

 “बळीराजाला खात्रीशीर वीज आणि नागरिकांना दिलासा”

या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी, लघुउद्योग, व्यावसायिक, तसेच सामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण काहीसा हलका होणार आहे.

घरगुती | औद्योगिक | व्यावसायिक ग्राहकांना दिलासा

 शेवटी एवढंच — ‘दर’ कमी झालाय, आता दिलासा ‘जास्त’ आहे!

राज्यभरातील नागरिकांसाठी ही एक सकारात्मक आणि ऐतिहासिक घडामोड आहे.