रोहियोचे अपूर्ण कामे समन्वय आणि गतिशीलतेने पूर्ण करा -मंत्री भरत गोगावले.
महाराष्ट्र वाणी
संभाजीनगर( औरंगाबाद), दि; ६ :- रोजगार हमीच्या माध्यमातून गोर- गरीब लाभार्थी आणि शेतकरी बांधवांच्या हिताला प्राधान्य देऊन सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी व फलोत्पादन , खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये रोजगार हमी विभागाच्या विविध विकास कामाच्या विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार रमेश बोरणारे, आमदार श्री विलास भुमरे, रोजगार हमी विभागाचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी लातूर भरत बास्टेवाड ,उपसचिव अरविंद पगार, सहसचिव अतुल कोरे, नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीन्नू, पी.एम,उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. विभागातील आठही जिल्ह्यातील रोहयो विभागाचे सर्व उप उपजिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारीउपस्थित होते.
मंत्री भरत गोगावले म्हणाले की, सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत काम करून घ्यावे, यासाठी समन्वय ठेवावा वेळोवेळी क्षेत्रभेटी देऊन अपूर्ण कामाचा आढावा घेण्यात यावा. सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हाधिकारी या सर्वांच्या समन्वयातून गोरगरीब सर्वसामान्य मजूर आणि शेतकऱ्यांना त्यांच्या विकास कामासाठी मदत व्हावी या हेतूने काम करणे आवश्यक आहे. रोजगार हमी विभागाच्या अंतर्गत विविध योजनासाठी उपलब्ध करून दिलेल्या मनुष्यबळाला वेळेत रुजू करून घेऊन त्यांच्या कामाचे वाटप करणे आवश्यक आहे. यातून काम पूर्ण करण्यासाठी गती मिळेल.भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत यातून अतिरिक्त वेळ गेल्यास त्याचा व्याजाचा निधी देण्यासाठी अडचणी येतात .ते टाळण्यासाठी वेळेत भूसंपादनाच्या मोबदल्याचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात प्राधान्य देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.
तीन महिन्याच्या आत मनेरगाची काम पूर्ण करावेत. केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील मनेरगाची कुशल आणि अकुशल चे काम पूर्ण करून उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन गोगावले यांनी संबंधित यंत्रणाला केले.
पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी वेळोवेळी पंचायत समिती स्तरावर कामकाजाचा आढावा घेण्याचे आवाहन संबंधित यंत्रणेला करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी सूचना बैठकीत केली .तसेच वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी शासनामार्फत त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. यामधून विहिरी ,शेततळे, मातोश्री पानंद रस्ते, घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून , मजूर मस्टर सुरू करण्याची मागणी बैठकीत केली.
छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा रोहयो विभागाचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी लातूर,भरत बास्टेवाड यांनी सादर केला. यामध्ये घरकुल, पानंद रस्ते ,युक्तधारा प्रणाली, फेस ऑथेंटिकेशन ,मजुरांचे मस्टर, शेततळे, कुशल आणि कुशल कामाच्या बाबतीत प्रलंबित असलेल्या बाबींचाही जिल्हानिहाय आढावा सादर करण्यात आला. यामध्ये ई -केवायसी करण्याचे प्रमाण कमी असून हे सर्व जिल्ह्यांनी लाभार्थ्यांचे ई-केवायसी करून घेण्याचे काम प्राधान्य करण्याचे आवाहन केले.