महारेशीम अभियान २०२६: जनजागृती वाहनास हिरवा झेंडा! जिल्ह्यात १०७२ शेतकऱ्यांची ११२२ एकर क्षेत्रावर तुती लागवड
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर,(औरंगाबाद) दि १७ :- महारेशीम अभियानाच्या फिरत्या जनजागृती वाहनास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज रवाना करण्यात आले. जिल्ह्यात १०७२ शेतकऱ्यांनी ११२२ एकर क्षेत्रावर तुती लागवड केली असून सहा खाजगी चॉकी/बाल अळी संगोपन केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यात रेशीम उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अडकुणे यांनी यावेळी केले.
*आपले सरकार पोर्टलवरुन नोंदणी सुविधा*
रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी 'महारेशीम अभियान- २०२६' राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग घोरण २०२३-२८ अंतर्गत रेशीम शेतीला केंद्रस्थानी ठेवत तुती लागवड व टसर रेशीम उद्योगासाठी शेतकरी उद्योजकांची नोंदणी, प्रचार व जनजागृती करण्याचा उद्देश या अभियानामागे आहे. अभियान काळात 'आपले सरकार' पोर्टलवरून नवीन शेतकरी व उद्योजक नोंदणीला विशेष प्रोत्साहन देण्यात येणार असून, रेशीम संचालनालयाच्या विविध सेवांची व्यापक प्रसिद्धी केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११ मार्च पर्यंत अभियान राबविले जाणार आहे.
माजी रेशीम उपसंचालक दिलीप हाके,केंद्रीय रेशीम मंडळाचे विभागीय विस्तार केंद्राचे शास्त्रज्ञ अंकुश गाडगे, रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे, प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी रविंद्र सांगळे,लेखाधिकारी पोपट चौधरी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांऐवजी रेशीम शेतीला प्राधान्य दिल्यास अधिक व निरंतर उत्पन्न मिळू शकते. जिल्ह्यातील हवामान रेशीम शेतीस अत्यंत अनुकूल आहे. पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून रेशीम शेती अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. जालना व बीड येथे जवळच बाजारपेठ उपलब्ध आहे. रेशीम शेतीबाबत आवश्यक तांत्रिक कौशल्य आत्मसात करून प्रायोगिक तत्त्वावर शेती करावी व कमी कालावधीत सातत्यपूर्ण उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करून रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी यावेळी केले.
*११०० एकर नोंदणीचे उद्दिष्ट*
सध्या जिल्ह्यात १०७२ शेतकऱ्यांनी ११२२ एकर क्षेत्रावर तुती लागवड केली असून सहा खाजगी चॉकी/बाल अळी संगोपन केंद्र सुरू आहेत. त्याद्वारे रेशीम शेतकऱ्यांना सुरुवातीचे आठ ते दहा दिवस लहान अळ्याचे संगोपन करून पुरवठा केला जातो. तसेच दोन रेशीम धागा निर्मिती केंद्र कार्यान्वित असून तेथे शेतकऱ्यांचे कोष खरेदी करून धागा निर्मिती केली जाते. जिल्ह्यासाठी रेशीम विभागास ३५० एकर, कृषी विभागास ४०० एकर व जिल्हा परिषदेस ३५० एकर असे एकूण ११०० एकर नवीन शेतकरी नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रेशीम विभागाने जिल्ह्यातील निवडक १४६ गावांमध्ये ३५० एकर लक्षाकांपोटी ७०० एकर नवीन शेतकरी नोंदणीचे नियोजन केलेले आहे. महा रेशीम अभियान कालावधीमध्ये निवड केलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन नवीन शेतकरी नोंदणीसाठी रेशीम उद्योगाविषयी माहिती, मार्गदर्शन, जन जागृती,प्रचार व प्रसिद्धी केली जाणार असल्याचे रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे यांनी सांगीतले.
*विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य*
रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (जी-राम- जी) अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तीन वर्षात ८९५ मनुष्य-दिवसांअंतर्गत मजुरी २ लक्ष ७९ हजार २४० रुपये व साहित्यासाठी १ लक्ष ५३ हजार रुपये असे एकूण ४ लक्ष ३२ हजार २४० रुपये अनुदान दिले जाते. तसेच केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र योजनेअंतर्गत तुती लागवड, सिंचन संच, कीटक संगोपनगृह बांधकाम, संगोपन साहित्य व निर्जंतुकीकरण औषधींसाठी एकूण ३ लक्ष ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. सिल्क समग्र-२ अंतर्गत बहुभूधारक शेतकऱ्यांना २ एकर तुती लागवडीसाठी ५ लक्ष ६२ हजार ५०० रुपये अनुदान मिळते. तसेच कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अंतर्गत तुती लागवडीसाठी ४५ हजार रुपये, रेशीम कीटक संगोपन गृहासाठी २ लक्ष ४३ हजार ७५० रुपये व संगोपन साहित्यासाठी ३६ हजार ३७५ रुपये, असे एकूण ३ लक्ष २५ हजार १२५ रुपये अनुदान दिले जाते.सन २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांनी समूहाने मनरेगा, सिल्क समग्र-२ व पोकरा योजनेंतर्गत तसेच वैयक्तिक स्वरूपात नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे यांनी केले आहे.
ऑनलाईन नोंदणी:- https://textileservices.mahaonline.gov.in/ या लिंकवरून नोंदणी करावी अथवा आपले सरकार पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडावा.
अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय,ज्ञानपिठ कॅम्पस नं.२,पहिला मजला, प्लॉट नं.टी-१८,
एम आय डी सी एरीया, गरवारे स्टेडीयम समोर,नारेगाव मेन रोड, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर पिन-४३१००६, येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक : दुरध्वनी क्र.0240-2994647.8669099422,9764706652,7020774505, 9923897767.