"महाराष्ट्रातील निवडणूकांमध्ये धांधलीचा आरोप; नाना पटोले यांची राष्ट्रपतींकडे चौकशी व सरकार बरखास्त करण्याची मागणी"

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, १२ जून :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेल्या पत्रातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित धांधलीवर तीव्र आक्षेप नोंदवत दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत – उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरू करणे.
नाना पटोले यांनी आपल्या पत्रात नमूद केलं की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच ८२ विधानसभा क्षेत्रांमधील १२,००० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या त्रुटींमुळे कोट्यवधी मतदारांच्या मतांचे मूल्य आणि निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले.
“ही बाब फक्त काँग्रेसची नाही, तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची चिंता आहे. लोक विचारत आहेत की त्यांच्या मतांचा गैरवापर झाला का? आणि खरेतर, लोकशाहीच्या मंदिरातच लोकशाहीचं अपहरण झालं का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नाना पटोले यांनी राष्ट्रपतींकडे खालील दोन मागण्या स्पष्टपणे मांडल्या —
1. निवडणुकीतील कथित अनियमिततेची स्वतंत्र व न्यायिक चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करावी.
2. चौकशी पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्रातील विद्यमान सरकार बरखास्त करून नवीन निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी.
“आपण राष्ट्राच्या सर्वोच्च संवैधानिक प्रमुख आहात. संविधानाच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी निर्णायक पावले उचलावीत,” असे आवाहनही त्यांनी पत्रात केले आहे.
या मागणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून पुन्हा एकदा निवडणुकीच्या पारदर्शकतेचा मुद्दा उचलून धरल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहे.