नात्यांची उधळण… माणसाच्या एकटेपणाची कहाणी!
महाराष्ट्र वाणी विशेष
एकेकाळी माणसं एकमेकांच्या सुख-दुःखाची साथ असायची. गरज पडली तर शेजारी साखर, पीठ, दूध मागणं ही फार सामान्य गोष्ट होती. त्या काळात भौतिक सुविधा कमी होत्या, पण माणुसकी शंभर टक्के होती.
नातं रक्ताचं असो किंवा मैत्रीचं – त्यात आत्मीयता होती, विश्वास होता, समंजसपणा होता.
आज मात्र चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं.
रक्ताची नाती सहज तुटतात, आणि अनेक वर्षांची मैत्री एका किरकोळ कारणावरून संपते.
पंचवीस-तीस वर्षांचा सहवास असलेली मैत्री काही क्षणात दूर जाते.
जवळची माणसं आता शारीरिकदृष्ट्या नाही, तर भावनिकदृष्ट्या दूर होत चालली आहेत.
एकेकाळी अडचणी आल्या की माणसं एकत्र यायची, आज मात्र अडचणीपासून माणसं माणसापासून दूर पळतात.
कधी काळी ‘तू माझा’ हे सांगण्याची आणि पटवून देण्याची गरज नव्हती. आज मात्र ‘आपलं’ कोणी आहे का, हाच प्रश्न भेडसावतोय.
भौतिक प्रगती झाली, सुखसुविधा वाढल्या, पण मनातली माणुसकी मात्र हरवत चालली आहे.
स्मार्टफोनच्या जगात "हाय-हॅलो"चं नातं राहिलंय – खऱ्या संवादाचं नातं नाही.
घराघरात मोबाईल आहेत, पण घरात माणसांमध्ये संवाद नाही.
आई-वडील, भाऊ-बहिण, नवरा-बायको – सर्वच नात्यांमध्ये संवाद कमी झाला आणि अंतर वाढलं.
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप हेच नवे नातेवाईक झाले आहेत.
पण मनातला गोंधळ, भावनांचा कोंडमारा वाढतोय.
समृद्धी आली, पण शांती गेली. पैसा वाढला, पण माणूस हरवला.
आज गरज आहे – थोडं थांबून आपल्या नात्यांकडे बघण्याची.
एक फोन, एक संवाद, एक मिठी – एवढं पुरेसं आहे नातं जपायला…
कारण शेवटी – माणसासाठी माणूसच हवाय… मोबाईल नाही!
🖋️ – महाराष्ट्र वाणी
"मनाला भिडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला सांगण्यासाठी!"