16 आश्वासने... पण काय दिलं? ‘मोदींची १६ आश्वासने हवेत विरलीत; शेतकरी सन्मान पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा हल्लाबोल’

16 आश्वासने... पण काय दिलं? ‘मोदींची १६ आश्वासने हवेत विरलीत; शेतकरी सन्मान पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा हल्लाबोल’
16 आश्वासने... पण काय दिलं? ‘मोदींची १६ आश्वासने हवेत विरलीत; शेतकरी सन्मान पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा हल्लाबोल’

महाराष्ट्र वाणी.com

यवतमाळ/मुंबई, दि. ३ जून :- "शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू", "कर्जमाफी देऊ", "एमएसपीवर दीडपट हमीभाव देऊ", "१५ लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकू" – अशा अनेक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये यवतमाळच्या दाभडीत ‘चाय पे चर्चा’ करत दिल्या होत्या. पण त्या केवळ आश्वासनापुरत्याच राहिल्या, असा घणाघात करत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी सन्मान पदयात्रा’ सुरु केली आहे.

या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, “या देशाचा पोशिंदा आज अन्नपाण्यावाचून रडतोय, भावाच्या अभावाने शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे आम्ही ही यात्रा दाभडीतून आर्णी, मुंबईमार्गे दिल्लीपर्यंत नेणार आहोत आणि मोदींना त्यांच्या १६ आश्वासनांची आठवण करून देणार आहोत.”

या पदयात्रेची सुरुवात दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरापासून करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन यात्रेची सुरुवात केली. शेवट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या सभेत करण्यात आला.

यात्रेच्या वेळी मंचावर अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते – माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या व खासदार प्रणिती शिंदे, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री अनिस अहमद, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, माजी मंत्री वसंत पुरके, आमदार राजेश राठोड, आमदार अनिल मांगुळकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर आणि सचिन नाईक यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

सपकाळ म्हणाले, “सोयाबीनचे तेल १६५ रुपये लिटरने विकले जाते, पण शेतकऱ्याला फक्त ३५-४० रुपये किलोचा भाव मिळतो. सोयाबीनचे उत्पादन खर्च पाहता भाव किमान ९ हजार रुपये असायला हवा, पण तो शेतकऱ्याला मिळत नाही. हा सारा फायदा अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींच्या घशात जातो. भाजप सरकार केवळ अंबानी-अदानींचीच बाजू घेतं आहे.”

ते पुढे म्हणाले, “‘हर घर तिरंगा’सारख्या अभियानासाठी भाजपने चीनमधून पॉलिस्टरचे झेंडे मागवले. हे ‘स्वदेशी’ सरकार आहे की ‘परदेशी’? सरकारला आता जाब विचारायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस मैदानात आहे आणि ही लढाई आता संपेपर्यंत थांबणार नाही.”

मंचावरील अन्य नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.