" शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी" मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय!"

" शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी" मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय!"
" शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी" मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय!"

मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र वाणी न्यूज

दि१६ जून:- राज्यात सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची पुन्हा एकदा सक्रियता दिसून येत असून, सोमवारी मोसमी पावसाने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापला आहे. तसेच विदर्भातीलही बहुतांश भागांत पावसाची हजेरी लागली आहे. पावसाच्या या दमदार हजेरीने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यंदा मोसमी पावसाचे आगमन अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजेच २४ मे रोजी केरळमध्ये झाले होते. त्यानंतर अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून हे वारे कारवारपर्यंत पोहोचले. २५ मे रोजी पाऊस देवगड, कर्नाटक व संपूर्ण गोव्यात दाखल झाला आणि लगेच मुंबईतही पोहोचला. मात्र, २६ मेनंतर वाऱ्यांची वाटचाल थांबली होती.

मुंबई, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये थोडक्याच भागांत पावसाने हजेरी लावली होती. परंतु पोषक वातावरणाचा अभाव असल्याने पुढील प्रगती थांबली. अखेर तब्बल २० दिवसांच्या खंडानंतर सोमवारी मोसमी वाऱ्यांनी नव्याने गती घेत संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व्यापले.

सध्या पावसाची सीमा गुजरातमधील वेरावल, भावनगर, वडोदरा, तसेच मध्य प्रदेशातील खरगोन, महाराष्ट्रातील काही विदर्भ भाग, छत्तीसगडमधील दुर्ग, ओडिशातील बारगड व चांदबलीपर्यंत पोहोचली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भाचा उर्वरित भाग, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांत लवकरच पावसाचे आगमन होईल.

तसेच पुढील दोन दिवसांत पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्येही पावसाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मोसमी पावसाची सक्रियता वाढल्याने कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.