जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; बळीराजा सुखावला, शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या!

जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; बळीराजा सुखावला, शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर, २६ जून :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल दिनांक २५ जूनच्या दुपारपासून समाधानकारक पावसाला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. सिल्लोड, सोयगाव, कन्नड, वैजापूर, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री या तालुक्यांत चांगल्या पावसाच्या सरी बरसल्या.

या आधी अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या करून टाकल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी उगवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस लांबत असल्याने चिंता होती. कालच्या पावसामुळे ही चिंता काही प्रमाणात दूर झाली असून, उगवणीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

सततच्या उकाड्यामुळे आणि ढगांच्या अनिश्चित हालचालींमुळे चिंतेत असलेला बळीराजा आता आशेच्या उंबरठ्यावर उभा आहे.

पावसाच्या या आगमनामुळे शेतकरी वर्गात चैतन्य संचारले असून, खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसाचा जोर टिकून राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे उगवणीसह पिकांच्या वाढीस मदत होणार आहे.

 "मेघराजाच्या आगमनाने बळीराजाची आशा फुलली; उगवणीसाठी आता योग्य वेळ!"