समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा खुला – विकासाचा नवा अध्याय सुरू; ठाणे खाडी पुलाचंही लोकार्पण

समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा खुला – विकासाचा नवा अध्याय सुरू; ठाणे खाडी पुलाचंही लोकार्पण
समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा खुला – विकासाचा नवा अध्याय सुरू; ठाणे खाडी पुलाचंही लोकार्पण

महाराष्ट्र वाणी न्युज 

इगतपुरी, नाशिक दि५ जून :- महाराष्ट्राच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा गाठत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा – इगतपुरी ते आमणे (७६ किमी) – आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आला. यावेळी सायन-पनवेल महामार्गावरील तिसऱ्या ठाणे खाडी पुलाच्या (दक्षिण वाहिनी) लोकार्पण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दोन्ही प्रकल्पांच्या उद्घाटनामुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. इंधन बचतीबरोबरच प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "समृद्धी महामार्गाच्या या अंतिम टप्प्यामुळे संपूर्ण महामार्ग आता नागपूर ते मुंबई पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे."

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "या दोन्ही प्रकल्पांमुळे औद्योगिक प्रगतीला गती मिळेल. विशेषतः नाशिक, ठाणे, पालघर आणि मुंबई परिसरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रकल्पाच्या वेगवान अंमलबजावणीसाठी शासनाच्या प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की, "अशा मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलत आहे, आणि हे पुढच्या पिढ्यांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे."

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते आमणे दरम्यानचा हा टप्पा अत्यंत निसर्गरम्य भागातून जात असून, पर्यटकांसाठीदेखील हा महामार्ग एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यामुळे नाशिकच्या पर्यटन उद्योगालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या या विकासाभिमुख धोरणामुळे महाराष्ट्र देशाच्या प्रगतीच्या शर्यतीत आघाडीवर जाण्यास सज्ज

झाला आहे.