"शिरसाट कुटुंबाकडून सरकारी जमिनीचा गैरवापर? – इम्तियाज जलील यांचे स्फोटक आरोप, कागदपत्रांसह पुरावे सादर"

"शिरसाट कुटुंबाकडून सरकारी जमिनीचा गैरवापर? – इम्तियाज जलील यांचे स्फोटक आरोप, कागदपत्रांसह पुरावे सादर"

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ११ जून :

एमआयडीसी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील वाद संपायच्या आत, आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबावर सरकारी जमीन लाटल्याचे गंभीर आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी विविध दस्तऐवज सादर करत ही माहिती समोर आणली.

इम्तियाज जलील यांनी सांगितले की, हरिजन समाजासाठी राखीव असलेली वर्ग-2 जमिन वर्ग-1 मध्ये रूपांतर करून, शिरसाट कुटुंबाने ती कवडीमोल दरात खरेदी केली. यामध्ये साजापूर येथील तब्बल 10 एकर जमिनीचा समावेश असून, ती केवळ 1 कोटी 10 लाख रुपयांत खरेदी करण्यात आली, जी सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 30 कोटींच्या आसपास आहे.

त्यांनी यामध्ये संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट, तुषार शिरसाट आणि त्यांच्या पत्नीची नावे असल्याचे नमूद केले. एवढी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी कशी झाली, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी जलील यांनी केली.

प्रशासनिक संगनमताचा आरोप

ही संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार रमेश मुनलोड आणि विवादास्पद तलाठी बागडे यांच्या संगनमताने पार पाडली गेल्याचा आरोपही त्यांनी केला. तलाठी बागडे यांना यापूर्वी आठ वेळा निलंबित करण्यात आले असूनही, त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती.

इतर व्यवहारही संशयास्पद

जालना रोडवरील न्यायालय समोरील 12,000 स्क्वेअर फूट जमीन शिरसाट कुटुंबाने फक्त 4800 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने म्हणजे सुमारे 5.83 कोटी रुपयांत खरेदी केली असल्याची माहितीही जलील यांनी दिली.

तसेच साजापूर येथील गट क्रमांक 34 मधील तीन वेगवेगळ्या व्यवहारांत कुटुंबीयांनी सुमारे 5 एकर जमीन वेगवेगळ्या दराने घेतल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी जलील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून, ते खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारविरोधी असल्याचे सिद्ध करावे, असेही सांगितले. अन्यथा त्यांना "चष्मा" पाठवण्यात येईल, असा टोला त्यांनी लगावला.

"मी खरेदीला उपलब्ध नाही" – इम्तियाज जलील

“माझ्यावर दबाव टाकण्यासाठी विरोधक माझी वैयक्तिक प्रकरणं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना काहीच मिळणार नाही,” असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षांनाही गप्प राहण्यावरून सवाल केला. तसेच सर्व पुरावे मुख्यमंत्री, राज्यपाल, ईडी, सीबीआय, आणि इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केलं.

बातमीचा सारांश:

शिरसाट कुटुंबावर सरकारी जमीन कवडीमोल भावात खरेदी केल्याचा आरोप

वर्ग-2 ची हरिजन राखीव जमीन वर्ग-1 मध्ये बदलून खरेदी

तहसीलदार आणि तलाठ्याच्या भूमिकेवर संशय

सादर केले दस्तऐवज आणि जमीन खरेदीचे तपशील

मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी,