वंदे भारत एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १९ जून :- जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवून वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. 20705) ही पुन्हा पूर्ववत जालना ते मुंबई मार्गावर सुरू करण्याची मागणी केली आहे.
पूर्वी ही गाडी जालना–सीएसएमटी (मुंबई) दरम्यान चालवली जात होती आणि छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ती अतिशय उपयुक्त ठरत होती. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी जवळपास १००% प्रवासी हे याच दोन जिल्ह्यांतील असल्याचे नमूद करत, त्यांनी मुंबईत वेळेत पोहोचून आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे.
सद्यस्थितीत या गाडीचा प्रारंभिक स्थानक नांदेड करण्यात आले आहे, त्यामुळे जालना व छत्रपती संभाजीनगर येथील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे नांदेडहून मुंबईसाठी आधीपासूनच अनेक गाड्या सुरू आहेत, परंतु जालना-संभाजीनगरसाठी वंदे भारत ही एकमेव जलद व सुसज्ज रेल्वे होती.
तरी सदर वंदे भारत एक्सप्रेस गाडी पुन्हा जालना-मुंबई मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी डॉ. काळे यांनी केली असून रेल्वे प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.