लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणूक जिंकण्याचा कट" – जितेंद्र आव्हाडांचा घणाघात

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि४ जून :- राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या योजनेतील चुका आणि पात्रता निकषांबाबत अजित पवारांनी खुलेपणाने कबुली दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी आखलेला "सुनियोजित कट" असल्याचा थेट आरोप केला आहे.
अजित पवारांची कबुली, आव्हाडांची टीका
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्याचे मान्य करताना, "या योजनेचा लाभ आता फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच दिला जाईल," असे स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "ही योजना म्हणजे मतं विकत घेण्यासाठीचा डाव होता. सरकार स्थापन झाल्यावर लक्षात आलं की राज्याच्या तिजोरीवर त्याचा प्रचंड ताण येतोय. आता साडेचार वर्षांनी सरकारला महिलांची आठवण येणार आहे का?"
‘लाडकी बहीण’ योजनेमागचा हेतू निवडणूक जिंकण्याचा?
आव्हाड म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठीच ही योजना आणली गेली. महिन्याला १५०० रुपये देऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता या बहिणींची गरज संपली आहे, हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते."
बकरी ईद व्हर्च्युअल करण्याच्या सूचनेवरही टोला
जितेंद्र आव्हाड यांनी बकरी ईद संदर्भातही राज्य सरकारवर टीका केली. "बकरी ईद व्हर्च्युअल करा असे सांगणारे मंत्री आहेत, उद्या जेवणही व्हर्च्युअल करा असंही सांगतील, ही कल्पना असलेले तंत्रस्नेही मंत्री आपल्याकडे आहेत," असा टोलाही त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर लगावला.
लाडकी बहीण योजनेची पार्श्वभूमी
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्यानंतर सरकारने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजना आणली होती. योजना राबवताना दरमहा १५०० रुपये आणि पुढे २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र निवडणूक झाल्यानंतर योजनेत काटेकोर छाननी सुरु झाली आणि आता सर्व महिलांना नव्हे तर केवळ पात्र महिलांनाच याचा लाभ दिला जातोय.
राजकीय वातावरण तापले
अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर ‘लाडकी बहीण’ योजनेभोवती नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप आणि सरकारची कबुली यामुळे राज्यातील महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीची
भावना पसरत आहे.