"प्रकाश महाजन एकट्यानेही पुरेसे; राणेंच्या मुलांवर दानवेंचा निशाणा!"

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ११ जून :- मनसे नेते प्रकाश महाजन हे एकट्यानेही कुस्ती लढवून जिंकू शकतात, अशा शब्दांत शिवसेना नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे व प्रकाश महाजन यांच्यातील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी महाजन यांच्या बीड बायपासवरील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
दानवे म्हणाले, "प्रकाश महाजन यांचे व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. राजकीय लढाईसाठी त्यांना कुणाची गरज नाही. ते स्वतंत्र विचारांचे, सक्षम नेते आहेत." महाजन व दानवे हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांत असले तरी त्यांच्यातील वैयक्तिक नातं जुने व जिव्हाळ्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या भेटीत राणेंवरही दानवे यांनी तोफ डागली. "नारायण राणेंची मुलं ज्या प्रकारे गलिच्छ भाषा वापरतात, ती राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंनी अशा भाषा वापरणाऱ्यांना थांबवले पाहिजे," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, मनसे नेते प्रकाश महाजन यांनीही राणेंवर जोरदार पलटवार केला. "बेडकाला सोन्याच्या पाळण्यात बसवले तरी उडी गटारीतच मारतो," या म्हणीचा संदर्भ देत त्यांनी राणेंवर टीका केली. तसेच, "नारायण राणेंच्या बाजूने भाजपमधील एकही नेता उभा राहिलेला नाही. यावरूनच त्यांच्या पक्षातील किंमत लक्षात येते," असा टोलाही त्यांनी लगावला.
महाजन आणि राणे यांच्यातील संघर्ष सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दानवे आणि महाजन यांची ही भेट याला नव्या वळणावर घेऊन जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.