पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज; १६ हजारांहून अधिक पुलांवर उपाययोजना

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज; १६ हजारांहून अधिक पुलांवर उपाययोजना

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई,(प्रतीनीधी) दि. २१ जून :- राज्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते व पूल सुरक्षित आणि वाहतुकीसाठी योग्य स्थितीत राहावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जोरदार तयारी केली आहे. मुख्य रस्ते आणि पूल यांची दुरुस्ती तसेच देखभाल तातडीने आणि वेगाने केली जात आहे.

राज्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते आणि इतर महत्त्वाचे मार्ग यांची दररोज देखरेख केली जात असून, पावसात होणाऱ्या अडथळ्यांवर वेळीच उपाय करण्यासाठी विभाग सतर्क आहे. पूल पाण्याखाली जाण्याच्या शक्यतेच्या ठिकाणी खबरदारीचे फलक लावण्यात आले असून, दुरुस्ती किंवा नवीन काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संपूर्ण राज्यभरात विभागाचे क्षेत्रीय अधिकारी सज्ज असून, पावसाळी धोके लक्षात घेता त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. विभागाच्या अखत्यारीत सध्या १६,५१९ लहान-मोठे पूल असून, यापैकी ४५१ पुलांचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. मागील दशकात १,६९३ पुलांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे.

धोकादायक स्थितीतील वा वाहतुकीसाठी बंद असलेल्या पुलांवर खबरदारीचे फलक आणि बॅरिकेड्स बसवण्यात आले आहेत. अशा ठिकाणांची माहिती सातत्याने शासनस्तरावरून घेतली जात आहे.

पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वेळीच प्रतिसाद देता यावा यासाठी कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अभियंता स्तरावरील अधिकाऱ्यांना ठराविक जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत.

जिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यरत असून, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंते त्याचे नियमित निरीक्षण करत आहेत.

ही सगळी पूर्वतयारी पाहता, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटांना सार्वजनिक बांधकाम विभाग सक्षमपणे सामोरे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.