"दुःखद त्रिकाल – जाफ्राबादमधील वरुड येथे एकाच कुटुंबातील तिघा चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू!"

"दुःखद त्रिकाल – जाफ्राबादमधील वरुड येथे एकाच कुटुंबातील तिघा चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू!"

महाराष्ट्र वाणी.com

जालना दि३ जून (प्रतिनिधी) :– जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील वरुड गावात मन सुन्न करणारी घटना घडली असून, एका कुटुंबातील तिघा बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश जोशी (वय 14), रोहन जोशी (वय 7) आणि दिपाली जोशी (वय 9) अशी मृत बालकांची नावे असून, हे तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. काल (2 जून) सकाळच्या सुमारास हे तिघे महादेव मंदिरात दर्शनासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्रीपर्यंत घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी शोध सुरू केला होता.

शोधादरम्यान आज सकाळी गावातीलच एका शेततळ्यात त्यांच्या चपला आणि काही वस्तू आढळून आल्या. संशयाच्या आधारे ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम राबवत शेततळ्यात पाहणी केली असता तिघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेबाबत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. “ही घटना काळजाला भिडणारी आहे. एकाच कुटुंबातील तिघा चिमुकल्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणं हे दुर्दैवी असून, जोशी कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे डॉ. काळे म्हणाले.