थोपवलेला सांस्कृतिकवाद थांबवायचा असेल, तर फुले-शाहू-आंबेडकर चळवळ गतिमान करा – डॉ. सुरेश माने
महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे (प्रतिनिधी शंकर जोग) दि ३ :- आज भारतात धर्माच्या नावाखाली सांस्कृतिकवाद जबरदस्तीने थोपवला जात आहे. त्यामुळे देशाचा इतिहास आणि मूळ संस्कृती हरवत चालली आहे. हा थोपवलेला सांस्कृतिक वाद थांबवायचा असेल, तर फुले-शाहू-आंबेडकर चळवळ नव्याने आणि जोरात उभी करावी लागेल, असं प्रतिपादन घटनातज्ञ प्रा. डॉ. सुरेश माने यांनी केलं.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन साहित्य कला अकादमीच्या वतीने पुण्यातील मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित चर्चासत्रात डॉ. माने उद्घाटक म्हणून बोलत होते.
अण्णाभाऊ साठे यांचे या देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोठे योगदान असून, त्यांचं साहित्य संघर्षशील असून समाजाला प्रेरणा देणारं आहे, असंही डॉ. माने म्हणाले. अण्णाभाऊंनी तत्कालीन व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं जे धाडस दाखवलं, त्यातून तमाम बहुजनांना स्वाभिमानाने जगण्याची दिशा मिळाली, असं ते म्हणाले.
कार्यक्रमात डॉ. जी. के. येनापुरे, श्रीमंत कोकाटे यांनी अण्णाभाऊंच्या कार्याचा आढावा घेतला. धम्मकीर्ती महाराज परभणीकर आणि साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनीही आपले विचार मांडले.
बहुजन साहित्य आणि कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी घोषणाही डॉ. माने यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष अमोल तुजारे, ॲड. अंबादास बनसोडे, अभय शेलार आणि धीरज बगाडे यांनी पुढाकार घेतला.
शेवटी एवढंच म्हणता येईल – ‘फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची मशाल पुन्हा पेटवण्याची हीच ती वेळ!’