संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 'डिजिटल हयात प्रमाणपत्र' बंधनकारक.
सत्यापन ॲप किंवा सेतू सुविधा केंद्रच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा उपलब्ध
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद),दि.२३ :- संजय गांधी योजना (शहर विभाग), छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'संजय गांधी निराधार योजना' आणि 'श्रावणबाळ वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजने'च्या सर्व लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) केवळ 'Beneficiary Satyapan App' द्वारेच सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.सर्व संबंधित लाभार्थ्यांनी वेळेत आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करून योजनेचा लाभ निरंतर सुरू ठेवावा, असे आवाहन तहसीलदार दिनेश झांपले, संजय गांधी शहर विभाग, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
लाभार्थ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून 'Beneficiary Satyapan App' डाऊनलोड करून स्वतःचे हयात प्रमाणपत्र विनामूल्य सादर करावे. ज्या लाभार्थ्यांना स्वतः ॲप हाताळणे शक्य नाही, त्यांनी जवळच्या सेतू सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी.केंद्रांवर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी लाभार्थ्यांकडून जास्तीत जास्त ५० रुपये इतकेच सेवा शुल्क आकारले जावे. केंद्रांनी कोणत्याही प्रकारची अवास्तव रक्कम मागू नये, अशा कडक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
एप्रिल २०२६ पासून सुरू असलेली ऑफलाईन प्रमाणपत्र स्वीकारण्याची पद्धत बंद करण्यात आली असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ७ मे २०२६च्या शासन निर्णयाद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.