“मेगाभरतीची घंटा! शाळा सुरू होण्यापूर्वी १३,००० शिक्षकांची भरती; १.७० लाख उमेदवार रेसमध्ये”
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १० :- राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच तब्बल १३ हजार शिक्षक पदांची भरती होण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. यात माध्यमिक शाळांमध्ये सुमारे ९ हजार आणि जिल्हा परिषद तसेच इतर शाळांमध्ये ४ हजार पदे भरली जाणार आहेत.
राज्यातील सुमारे १७ हजार माध्यमिक शाळांमध्ये १५ हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता. दरम्यान, संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे ३० एप्रिलपूर्वी समायोजन पूर्ण करण्याचे काम सुरू असून, त्यानंतरच अंतिम रिक्त पदांची संख्या निश्चित होणार आहे.
यानंतर मे महिन्यात ‘पवित्र पोर्टल’वर भरतीची जाहिरात एकाचवेळी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी आतापर्यंत सुमारे १.७० लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यामुळे स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.
भरती प्रक्रियेत उमेदवारांना शाळांची पसंतीक्रम यादी द्यावी लागणार आहे. सरकारी शाळांसाठी १०० तर खासगी अनुदानित शाळांसाठी ५० पर्याय निवडण्याची संधी मिळेल. गुणवत्ता यादीच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती थेट होईल, तर खासगी संस्थांमध्ये एका पदासाठी तीन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
‘टीईटी’बाबत नियम कायम
इयत्ता १ ते ८ वीच्या शिक्षकांसाठी टीईटी पात्रता अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शिक्षकांनी दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. दरम्यान, २१ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी १६ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📊 भरतीचा थोडक्यात आढावा:
माध्यमिक शाळा : ९,००० पदे
झेडपी व अन्य शाळा : ४,००० पदे
एकूण भरती : १३,००० पदे
👉 शिक्षण क्षेत्रातील ही मोठी संधी; पण स्पर्धा जबरदस्त — तयारी असेल तरच यश निश्चित!