भविष्यातील पाण्याच्या गरजेप्रमाणे योग्य नियोजन करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि,११ :- गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जिल्ह्यामध्ये मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे. भविष्यातील पाण्याची गरज पाहता काही तालुक्यांसाठी पाणी आरक्षित करण्याचे नियोजन जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयने करावे ,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अकस्मिक पाणी आरक्षण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री सब्बीनवार, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने,निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विजय कोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख,यांच्यासह जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटबंधारे, जलाशयातील आकस्मिक, आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजेची निश्चिती करण्या साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आजपर्यंत जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा एकूण 94% आहे. गत वर्षी हा पाणीसाठा 28% होता .भविष्यात गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता भासू शकते या अनुषंगाने जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाने 122 गावांसाठी 30.575 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्याचे नियोजन केलेले आहे. हे आरक्षित पाणी नांदूर मधमेश्वर पाणी प्रकल्पातून करण्यात आले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर करिता एकुण 35.04 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्याचे नियोजन केलेले आहे.जिल्ह्यात लहान आणि मोठ्या प्रकल्पाचे मिळून एकत्रित पाणीसाठा हा जिल्ह्याच्या गरजेनुसार आरक्षित केला जातो .यामध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन इतर पाणी हे सिंचनासाठी वापरले जाते.