जनमाणसातले जिल्हाधिकारी – दिलीप स्वामी साहेब! (शेतकरी श्री. नानासाहेब कदम, देवगाव रंगारी यांचे मनोगत)

जनमाणसातले जिल्हाधिकारी – दिलीप स्वामी साहेब! (शेतकरी श्री. नानासाहेब कदम, देवगाव रंगारी यांचे मनोगत)

काल सोमवारचा दिवस... दुपारी साधारण एकच्या सुमारास माझी गाडी संभाजीनगर-वैजापूर रोडवर अचानक बंद पडली. मी रस्त्याच्या कडेला उभा होतो. इतक्यात संभाजीनगरचे जिल्हाधिकारी मा. दिलीप स्वामी साहेबांची गाडी पुढे गेली आणि काही क्षणांतच परत फिरली… थेट माझ्याजवळ!

त्यांच्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डने गाडी थांबवली. साहेब गाडीतून उतरले, आणि माझ्याकडे येऊन विचारपूस करू लागले –

“पेरण्या झाल्या का?”, “खते-बियाणे मिळतात का?”, “कुठे काळाबाजार तर नाही ना?”

अहो, एवढा मोठा अधिकारी... पण आपुलकीनं बोलणं आणि जमिनीवरचं नातं जपणं हे त्यांच्या वागण्यात स्पष्ट दिसत होतं.

साहेबांनी मला ओळखलं देखील –

“तुम्हीच ना ते सरपंच, जे काही महिन्यांपूर्वी मोसंबी फळगळीसंदर्भात निवेदन घेऊन आले होते?”

मी तर थक्कच झालो! कित्येक अर्जदार, हजारो लोकांचा जिल्हा... पण साहेबांना माझी आठवण होती!

मी माझ्या मोबाईलमधील मोसंबीच्या फळगळ फोटो दाखवले. २५-३० फोटो त्यांनी तपासले.

फळबागांचा विमा हवामानावर आधारित असतो, त्यात फळगळ विचारात घेतली जात नाही – हाच मुद्दा मी साहेबांसमोर मांडला. त्यांनीही तो गांभीर्याने घेतला.

साहेब म्हणाले –

“संभाजीनगरला या, आपण हा प्रश्न वरच्या पातळीवर नेऊ. मीही शेतकरीपुत्र आहे. तुम्हा लोकांचे दुःख समजतो.”

इतकंच नाही तर, बाजूच्या टपरीवर सर्वांना स्वतः घेऊन गेले, चहा दिला, आणि त्याचे पैसेही कोणाला द्यायला दिले नाहीत.

हा एक क्षण नव्हता – हा एका जबाबदार, संवेदनशील, आणि जमीन जोडलेला जिल्हाधिकारी कसा असतो, याचा अनुभव होता!

ACमध्ये बसून आदेश देणारे अनेक पाहिले... पण असा जनमाणसातला, जमिनीशी नाळ असलेला कलेक्टर पाहणं हा अभिमानाचा क्षण होता.

धन्यवाद मा. दिलीप स्वामी साहेब 

आपण प्रशासनाच्या कक्षा मोडून, थेट जनतेच्या हृदयात स्थान मिळवत आहात!

(महाराष्ट्र वाणी न्युज)