खतटंचाई गंभीर; जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक, कंपन्यांना कठोर इशारा

खतटंचाई गंभीर; जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक, कंपन्यांना कठोर इशारा

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २४ जून :– खरीप हंगामाच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर खतटंचाईवर दिनांक २३ जून रोटी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक पार पडली. खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खत वितरणाच्या अडचणी, साठा स्थिती आणि तातडीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सध्या दोन्ही जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये खताचा तुटवडा जाणवत असून, यामुळे पेरणी प्रक्रिया खोळंबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी खत विक्रेत्या कंपन्यांना वेळीच खताचा पुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

विशेषतः सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांतील काही गावांमध्ये परिस्थिती अधिक बिकट असून, या भागांना तातडीने जळगाव जिल्ह्यातून खत रॅक उपलब्ध करून देण्याची विनंती जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

"खताच्या वितरणात कोणतीही टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही. दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.