किराडपुरा भागात मोठी कारवाई! १०५ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या; पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागचं मुख्य कारण दूर

किराडपुरा भागात मोठी कारवाई! १०५ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या; पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागचं मुख्य कारण दूर
किराडपुरा भागात मोठी कारवाई! १०५ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या; पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागचं मुख्य कारण दूर

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर, दि. २४ जून :- शहरातील अनधिकृत नळजोडण्या ही मुख्य जलवाहिनीत दबाव कमी होण्याची आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची मुख्य कारणे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून, आज मोहल्ला किराडपुरा भागात २०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून १०५ अनधिकृत नळजोडण्या पोलिस बंदोबस्तात खंडित करण्यात आल्या.

ही कारवाई महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वात पार पडली. विशेष पथकाच्या समन्वयाने ही मोहीम अंमलात आणली गेली.

कार्यकारी अभियंता किरण धांडे यांच्या आदेशानुसार, उपअभियंता लक्ष्मीकांत कोतकर, अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता आनंद राजपूत, भूषण देवरे तसेच कर्मचारी वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तुषार पोटपिल्लेवार व सागर डीघोळे यांनी ही कारवाई केली.

कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक घुले मॅडम, पोलीस उपनिरीक्षक खटने, बुरुड, तडवी, वाघमारे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

किराडपुरा परिसरातील नागरिकांकडून गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. तपासणीत मुख्य जलवाहिनीत अनेक अनधिकृत जोडण्या असल्याचे आढळून आले. त्यानंतर ही कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यात आली.

महापालिकेने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, अनधिकृत नळजोडण्या घेऊ नयेत. अशा जोडण्या केल्यास संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आणि इतर रहिवाशांना त्याचा फटका बसतो. भविष्यात अशा जोडण्यांविरोधात नियमितपणे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

📢 "पाण्यासारखा मुद्दा हलका घेऊ नका – अनधिकृत जोडण्या म्हणजे इतरांच्या हक्काच्या पाण्यावर घाला!"