अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर! जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची अभिनव संकल्पना
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २३ :– "शासन तुमच्या दारी" पेक्षा पुढे जात, आता "अधिकारी तुमच्या बांधावर!" जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रशासन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या दारी पोहोचले आहे. खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘शेतकरी-अधिकारी सुसंवाद’ हा उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महसूल, कृषी, ग्रामविकास, भूमिअभिलेख, सहकार, वन विभाग तसेच विविध बँकांचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. यात बियाणे, खते, पीककर्ज प्रक्रिया, शेत रस्ते, फेरफार, मालकी हक्क अशा विविध बाबींवर चर्चा होऊन थेट शेतातच तक्रारींचे निवारण केले जात आहे.
या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः लक्ष्मण खंडेराव रहाणे या शेतकऱ्याच्या नांदगाव (ता. वैजापूर) येथील गट क्रमांक १२ मधील शेतावर भेट देऊन केली. एक प्रकारे 'बांधा-बांधावर सुसंवाद' घडवून आणत प्रशासनाचा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रत्येक तालुक्यात किमान १० शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन भेटी घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, गावोगावी भेटी देत शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्षात समजून घेऊन तत्काळ निवारण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत.
हा उपक्रम शेतकऱ्यांच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करणारा ठरत असून, "शेतकरी केंद्रस्थानी" हा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरवणारा ठरत आहे.