सत्तालोलुप राजकारणाला ‘आप’चा शह; स्वबळावर सर्व जागा लढवणार – प्रकाश जरवाल
महाराष्ट्र वाणी
पुणे दि २३ :- महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपली विचारधारा बाजूला ठेवून सामान्य माणसाचा अपेक्षाभंग केला आहे. आज कोण नेता कुणासोबत आहे, हेच समजणे कठीण झाले आहे. राज्यात भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली असून निवडणूक जिंकल्यानंतर अनेक नगरसेवक कोट्यधीश बनत आहेत, अशी टीका आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी व दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल यांनी केली.
पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सामान्य माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि रोजगाराचे सक्षमीकरण हे आम आदमी पार्टीचे मुख्य धोरण राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली व पंजाबमध्ये राबवलेले विकास मॉडेलच महाराष्ट्रातही लागू केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम आदमी पार्टी आगामी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुका स्वबळावर लढवणार असून शक्य तितक्या सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न राहील, असे जरवाल यांनी सांगितले. पक्षाकडे प्रामाणिक व इमानदार कार्यकर्ते असल्याने अनेक ठिकाणी उमेदवार यादी जाहीर करून ‘आप’ने आघाडी घेतली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आम आदमी पार्टीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंग, माजी मुख्यमंत्री अतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राखी बिडलान हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नगरपरिषद निवडणुकीत नेवासा येथे ‘आप’च्या शालिनीताई सुखधान विजयी झाल्या असून महाराष्ट्रात पक्षाचे खाते उघडले आहे, अशी माहिती राज्य कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी दिली.
पत्रकार परिषदेस राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
✍️ सत्तेच्या खेळात अडकलेल्या राजकारणाला पर्याय देण्याचा दावा करत ‘आप’ महाराष्ट्रात किती प्रभाव पाडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.