बियाणे-खते चढ्या दराने विक्री प्रकरणी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अंबादास दानवे यांची अधिकाऱ्यांना सक्त सूचना

बियाणे-खते चढ्या दराने विक्री प्रकरणी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अंबादास दानवे यांची अधिकाऱ्यांना सक्त सूचना
बियाणे-खते चढ्या दराने विक्री प्रकरणी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अंबादास दानवे यांची अधिकाऱ्यांना सक्त सूचना

महाराष्ट्र वाणी न्युज 

गंगापूर ८ जून :- खरीप हंगाम सुरु असताना शेतकऱ्यांना चढ्या दराने बियाणे व खते विकणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा, अशी सक्त सूचना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

दानवे हे सध्या गंगापूर तालुक्यातील विविध गावांच्या भेटीवर असून, गावागावातून त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी बियाणे व खतांच्या महागड्या विक्रीसंदर्भात तक्रारी केल्या. काही व्यापारी बियाण्यांच्या खरेदीसोबत इतर वस्तूंची जबरदस्तीने लिंकिंग करत असल्याचेदेखील आरोप शेतकऱ्यांनी केले.

या पार्श्वभूमीवर आज ८ जून रोजी दानवे यांनी गंगापूर तालुक्यातील दहेगाव येथील एका कृषी सेवा केंद्राला अचानक भेट दिली. त्यांनी गोदामाची पाहणी करत बियाणे व खते साठा तपासला. शेतकऱ्यांच्या तक्रारींनुसार वस्तुस्थिती जाणून घेतली आणि कृषी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला.

यानंतर अधिकाऱ्यांना संबोधित करत दानवे म्हणाले, "शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दरातच बियाणे आणि खते मिळाले पाहिजे. कोणत्याही प्रकारची लिंकिंग किंवा महाग विक्री होऊ नये. अन्यथा अशा व्यापाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करा."

शेतकऱ्यांचे हक्क आणि खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी ही कारवाई अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दानवे यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, तर कृषी विभागाला सजगतेने काम करण्याचा स्पष्ट संदेशही दिला गेला आहे.