खतांची टंचाई थांबणार! कृषी विभागाने सुरू केला ब्लॉग – शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार माहिती

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि.२५ जून :- शेतकऱ्यांना आता खतांच्या उपलब्धतेबाबतची अचूक आणि ताजी माहिती त्यांच्या मोबाईलवर सहज मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून तालुकानिहाय कृषी सेवा केंद्रांवरील खतांच्या साठ्याची माहिती देणारा विशेष ब्लॉग तयार करण्यात आला आहे.
https://adochhatrapatisambhajinagar.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_24.html या लिंकवर शेतकरी बांधवांना गोणीच्या संख्येसह खताच्या प्रकारानुसार माहिती मिळणार असून, हे अपडेट दररोज करण्यात येणार आहे. ही माहिती विनामूल्य उपलब्ध असल्याने काळाबाजार आणि इतर अनियमिततेला आळा बसेल, असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या ब्लॉगच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
या वेळी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रकाश देशमुख, कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.
‘अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरती’ या उपक्रमात खतांच्या उपलब्धतेबाबत अनेक तक्रारी समोर आल्याने ही उपाययोजना राबवण्यात आली आहे. या ब्लॉगद्वारे कृषी केंद्रांतील प्रत्यक्ष साठा आणि ऑनलाईन साठ्यातील फरक देखील दुरुस्त करण्यास मदत होणार आहे.
ब्लॉगचे तांत्रिक अद्ययावतपणासाठी पंकज ताजने यांची नियुक्ती करण्यात आली असून, शेतकरी बांधवांना हे साधन अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
📲 शेतीविषयक माहिती आता मोबाईलवर – तुमचा हक्काचा डेटा, तुमच्या हातात!